⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

कॅनडाविरोधात भारताने उचललं सर्वात मोठ पाऊल ; काय आहे वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या सगळ्या तणावाचा दोन्ही देशातील व्यापारी संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता असून दिवसेंदिवस दोन्ही देशातील संबंध आणखी खराब होत चालले आहेत.

याच दरम्यान, भारताने आता कॅनडाविरोधात सर्वात मोठ पाऊल उचललं आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली आहे.अहवालानुसार, बीएलएस इंडिया व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरने भारतीय मिशनने जारी केलेल्या नोटीसचा हवाला देत म्हटले आहे की कॅनडामधील भारतीय व्हिसाशी संबंधित सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. कॅनडामधील भारतासाठी व्हिसा फक्त BLS इंडियाद्वारे प्रदान केला जातो.

नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, ऑपरेशनल कारणांमुळे, भारतीय व्हिसा सेवा आज म्हणजेच 21 सप्टेंबर 2023 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आला आहेत. पुढील अद्यतनांसाठी BLS इंडिया वेबसाइटला भेट देत रहा.

दरम्यान, भारताने कॅनडाला चाललेल्या सर्व नागरिकांना सावध राहण्याची सूचना केली आहे. तिथे राहणाऱ्या भारतीयांना सुद्धा सर्तक राहण्यास सांगितलं आहे. कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया, गुन्हे वाढत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एडवायजरी जारी करण्यात आली आहे. कॅनडातील खासदार चंद्रा आर्य यांनी दावा केला होता की, गुरपतवंत सिंह पन्नूच्या समर्थकांनी कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू नागरिकांना लक्ष्य केलं.