मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यातील ३१९ गावे पाणी टंचाईच्या छायेखाली

एप्रिल 19, 2023 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 19 एप्रिल 2023 । जिल्ह्यासाठी संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात टंचाईच्या छायेतील ३१९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांसाठी अडीच कोटींच्या पाणीपुरवठा योजनांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने पंचायत समिती आणि ग्राम पंचायत स्तरावरून उपाययोजनांचे प्रस्ताव मागविले आहेत.

water problem jalgaon jpg webp

राज्यभरात जळगाव जिल्हा हॉट म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जळगाव जिल्ह्याचे सरासरी तापमान ४५ अंशापेक्षा अधिक राहते. यंदा पाऊस लांबणीवर पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यासोबतच यंदा तापमानही सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे उन्हाचा फारसा तडाखा जाणवला नाही. एप्रिल महिन्यात मात्र उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यातच तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.

तापमानाचा पारा वाढताच जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात जामनेर तालुक्यातील दोन गावांत दोन टँकर, पारोळा येथे दोन, बोदवड आणि भडगाव येथे प्रत्येकी एक, असे सहा टँकर सुरू करण्यात आले आहेत. जामनेर तालुक्यात आठ, भुसावळ आणि भडगाव तालुक्यात प्रत्येकी एक आणि पारोळा तालुक्यात दोन विहिरींचे अधिग्रहण, तर जळगाव तालुक्यातील मौजे लोणवाडी बुद्रुक येथे एक आणि चाळीसगाव तालुक्यातील मौजे हातगाव भिल्ल वस्ती येथे एक, अशा दोन तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now