जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२५ । महाराष्ट्रामध्ये १४ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान श्रावणाची चाहूल जळगावच्या केळींसाठी लाभदायक ठरत आहे. कारण श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानसह हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशातून अचानक मागणी वाढल्याने जळगाव जिल्ह्यातील उत्पादित केळी भावात क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. श्रवणपूर्वी केळीच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

उत्तर भारतात पंचांगानुसार कृष्ण पक्षापासून महिना सुरू करण्याची परंपरा असल्यामुळे यंदाही त्या भागातील राज्यांमध्ये १५ दिवस आधीच पौर्णिमेनंतरच्या पहिल्या सोमवारी श्रावण महिना सुरू होत आहे. तर महाराष्ट्रात १४ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, श्रावणात हिंदू कुटुंबात उपवास केला जातो काहीजण महिनाभर उपवास करतात तर काही जण महिन्यातील शनिवार व सोमवार उपवास करतात.

सध्या बाजारात अन्य कोणत्याही हंगामी फळांची फार उपलब्धता नसल्याने केळीच्या मागणीत मोठी वाढ होण्यास चालना मिळाली आहे. त्याअनुषंगाने, फळांच्या व्यापाऱ्यांनी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तसेच महाराष्ट्रातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यांकडे केळी खरेदीसाठी आपला मोर्चा वळविला आहे. बऱ्हाणपुरात ९ जुलैला केळीचे भाव किमान १६१६, कमाल २६७५ आणि सरासरी २१८० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता. यापूर्वी २५ जून केळीला किमान ९७०, कमाल १९०३ आणि सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे भाव होता.
दरम्यान, सध्या उत्तर भारताकडून होत असलेली मागणी आणि तयार मालाच्या तुटवड्याची स्थिती लक्षात घेता आगामी काळातही केळीचे भाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे.







