जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे मागच्या काही दिवसात केळीला भाव नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यातच आता बदलत्या हवामानामुळे केळीवर करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. करप्याचा विळखा वाढल्यास केळीचा दर्जा घसरण्याची शक्यता असून उत्पन्नात मोठी घट येऊ शकते. यावर उपाययोजना करताना शेतकरी मेटाकुटीला आल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

रावेर तालुक्यातील अनेक ठिकाणी केळीवर करप्याचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. रावेर तालुक्यात २३ हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे. त्यापैकी मे, जून, जुलैत लागवड झालेल्या नवती बागांमध्ये करपा आढळतो आहे. हे प्रमाण सरासरी ६५ ते ७० टक्क्यापर्यंत आहे. गेल्या महिन्यात पावसाने धुमाकूळ घातलेला दिसून आला असून आता मागच्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलीय. मात्र सतत ढगाळ वातावरण, आणि पावसामुळे केळीवर करप्याचा प्रादुर्भाव होण्यास सूरूवात झाली आहे.

पावसाळ्यानंतर जमीन कोरडी पडते. तसेच तिला तडे पडतात. जैविक ताण आल्यामुळे मुळा तुटतात. यासह आर्द्रतेचे प्रमाण वाढणे तसेच जून, जुलैमधील लागवड झालेल्या बागांना गर्भधारणेची अवस्था एकत्र आल्याने खोडाच्या खालील पानांवर सूर्यप्रकाश पडत नाही. त्यामुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. आधी सीएमव्ही व त्यानंतर करपा यासारख्या रोगामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. करप्याचा विळखा वाढल्यास केळीचा दर्जा घसरण्याची शक्यता असून उत्पन्नात मोठी घट येऊ शकते.










