⁠ 
मंगळवार, मार्च 19, 2024

ग्रामपंचायत आहे की IPL टीम! सरपंच, उपसरपंचासह सदस्य पदांचा लिलाव ; आकडे ऐकून व्हाल चकित

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२३ । भारतात IPL क्रिकेट स्पर्धा खेळविली जाते, हे प्रत्येकाला माहिती असेलच. IPL मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाकडून खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी लाखो कोटींच्या बोली लावली जात असते. खेळाडू जितका मोठा तितकी बोली मोठी, असं एकंदर त्या लिलावाचं चित्र असतं. असंच काहीसं औरंगाबाद जिल्ह्यात घडलं आहे. मात्र क्रिकेटचा येथे काहीच संबंध नव्हता. येथे लिलाव ग्रामपंचायचीचा होत होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड आला आहे. पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ TV9 मराठी या वृत्तवाहिनेने प्रसारित केला आहे.

मतदारांच्या मताच्या अधिकारातून निवडून दिलेल्या उमेदरांकडून सरपंच, उपसरपंच अशा पदासाठी पैशांची उधळण सुरु होती. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे. आता याबाबत काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव केला होता. यात सरपंचपद 14 लाख 50 हजार, तर उपसरपंच पद 4 लाखात विकले, त्याचबरोबर सदस्य पदासाठी 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत बोली लागली होती.सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा झाला नसल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे गावातील नागरिकांकडून लिलावाची जाहीर कबुली देण्यात आली आहे.

शकुंतला योगेश ससेमहल असं साडे चौदा लाख रुपये देऊन सरपंच पदी निवडून आलेल्या महिलेचे नाव आहे. राजू म्हस्के असं 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचांनी हा प्रकार उजेडात आणला आहे.