⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आशादीप महिला वसतिगृहाची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ ।  जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात कोणतेही गैरकृत्य घडलेले नसून याबाबत सत्यतेची पडताळणी न करता बदनामी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी नऊ संघटनांच्यावतीने जिल्हा दंडाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्या कडे करण्यात आली.

जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील आरोप करणारी महिला तिचे मौखिक आरोप, महिला व पुरुष संघटनेने दिलेले निवेदन, यातील तथ्य, सत्यता न तपासता माध्यमाद्वारे ते प्रसिद्ध केले गेले. इतकेच नव्हे तर राज्यातील जबाबदार व्यक्तिमत्व असलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व इतर आमदारांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव जिल्ह्याला बदनामी करण्याचा दुष्ट हेतूने विधानसभेच्या सभागृहात देखील बेजवाबदारपणाने सत्तारुढ पक्षाला बदनाम करण्यासाठी आरोप केलेले आहेत.

वास्तविक पाहता आरोप करणार्‍या महिला व इतर संघटना किंवा लोकप्रतिनिधींनी वस्तीगृहाच्या अधीक्षकांशी चर्चा केलेली नाही. वस्तीगृहात कोणताही अनैतिक प्रकार घडलेला नाही हे विशेष चौकशी समोर सिद्ध झालेले आहे. परंतु, या खोट्या वृत्तामुळे वस्तीगृहातील सतरा तरुणी, जळगाव शहर महिला बाल कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार व विशेष करून महाराष्ट्र व जळगाव पोलीस दलाची बदनामी झालेली आहे. अशी बदनामी संगनमताने, हेतुपुरस्कर व सरकारला अधिवेशन चालू असल्याकारणाने बदनाम करण्याच्या शुद्ध हेतूने केलेली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर बेदरकारपणे निवेदन देणे, बातम्या पसरवणे ,संगनमताने आरोप करणे व जळगाव जिल्ह्याची बदनामी करून जिल्ह्यातील तरुण-तरुणींचा आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळे संबंधितांवर अत्यंत कडक स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी या नऊ संघटनांनी जिल्हादंडाधिकारी यांच्या कडे केलेली आहे.

जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांची शुक्रवारी संध्याकाळी या  ९ संघटनांच्यातर्फे निवेदिता ताठे ,गजानन मालपुरे व फारुक शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. डॉ. राऊत यांचेशी चर्चा करून त्यांना या नऊ तक्रारी सादर केलेल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांनी याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र विधिमंडळात ४ मार्च २१ ला चौकशीची घोषणा केलेली आहे तसेच पीआरबी कायद्यानुसार  त्यांना असलेल्या अधिकारानुसार काय कारवाई करता येईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

गजानन पुंडलिक मालपुरे, अध्यक्ष साहेब प्रतिष्ठान व माजी महानगरप्रमुख शिवसेना, निवेदिता ताठे,सदस्य जिल्हा महिला सल्लागार समिती ,फारुक शेख अध्यक्ष जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी ,पंकज किसन नाले अध्यक्ष जनमत प्रतिष्ठान जळगाव, अरुण दीपक पाटील काँग्रेस शहराध्यक्ष जळगाव, कल्पना दिलीप पाटील पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष जळगाव, अंजली पाटील ग्रामपंचायत सदस्य भादली , हर्षाली पांडुरंग पाटील अखिल भारतीय शाहू ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष जळगाव, सरिता माळी – कोल्हे अखिल भारतीय समता परिषद जिल्हाध्यक्ष जळगाव तथा संस्थापिका साहस फाउंडेशन जळगाव, यांनी वैयक्तिक तक्रारी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या आहेत.