जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा ; शासनाची ९.८६ कोटींच्या मदतीस मान्यता

सप्टेंबर 23, 2025 10:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवसात राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी होत आहे. याच दरम्यान राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात जुलै – ऑगस्ट 2025 या महिन्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत पिकाच्या नुकसानीपोटी,राज्य शासनाने 1 हजार 339 कोटी 49 लाख रुपयांच्या मदतीस मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरच थेट त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

affected by heavy rains

जळगाव जिल्ह्यातील ८ हजार हेक्टरवरील १७,३३२ शेतकरी नुकसानग्रस्त ठरले असून, त्यांना एकूण ९ कोटी ८६ लाख रुपयांची मदत वितरीत होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात झालेल्या मोठ्या प्रमाणा वरील नुकसानानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती. तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. यानंतर आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे या जिल्ह्यातील मंत्र्यांनी एकत्रितपणे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला.

जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली आणि पंचनामे जलद करण्याच्या सूचना दिल्या. आज शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात दिला आहे. जळगाव जिल्ह्यालाही जवळपास १० कोटींचा निधी मिळत आहे. हा निधी मिळवण्यासाठी माझ्यासह जिल्ह्यातील सर्व मंत्री सतत पाठपुरावा करत होतो. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून, शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील.सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी मुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत जाहीर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now