रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याच्या निर्णयावर त्वरित हस्तक्षेपाची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारने १ सप्टेंबर २०२५ पासून ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा बंद करून तिला ‘स्पीड पोस्ट’ मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील स्टार्टअप्स आणि लघु उद्योजकांवर आर्थिक आणि व्यवहार्य अडचणी येऊ शकतात, असे मत एपेक्स स्टार्टअप ग्रुप, जळगाव च्या सदस्यांनी मांडले. या पार्श्वभूमीवर, एपेक्स स्टार्टअप ग्रुपच्या शिष्टमंडळाने जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले.

शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की, रजिस्टर्ड पोस्ट ही सेवा किफायतशीर आणि विश्वसनीय असल्यामुळे स्टार्टअप्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषतः “प्राप्तकर्ता-विशिष्ट वितरण” (Addressee-specific delivery) आणि हस्ताक्षरयुक्त पोचपावती (Proof of Delivery) यांसारख्या सुविधा विविध कायदेशीर व शासकीय दस्तावेजांच्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वाच्या आहेत. स्पीड पोस्टच्या तुलनेत रजिस्टर्ड पोस्ट अधिक स्वस्त असून, तिचा पर्याय बंद केल्यास “लास्ट-माईल डिलिव्हरी” ची खर्चिकता वाढेल.
खासदार स्मिताताई वाघ यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले आणि या मुद्यावर केंद्रिय दळणवळण मंत्री ना. ज्योतिरादित्य सिंधिया तसेच डाक विभागाशी तातडीने चर्चा करून विषय मांडण्याचे आश्वासन दिले. त्यांनी असेही सांगितले की, ‘एपेक्स स्टार्टअप ग्रुप’ने मांडलेले मुद्दे अत्यंत वाजवी असून, अशा प्रयत्नांमुळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास खूप प्रेरणा मिळते. त्यांनी यापुढील काळातही स्टार्टअप्सच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटीचे आवाहन केले.
या प्रसंगी ‘एपेक्स स्टार्टअप ग्रुप’चे अजिंक्य तोतला, गोकुळ चौधरी, सागर पाटील, आर्यन मणियार, अशुतोष रंगा, निकुंज रंगा, आदित्य शर्मा, गजानन फेटरे, समर्थ पाटील, अॅड. धनंजय केजरीवाल, इ. सदस्य उपस्थित होते. ‘एपेक्स स्टार्टअप ग्रुप’ने पुढील काळात स्टार्टअप्सशी संबंधित आणखी मुद्दे खासदारांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे.








