जळगाव लाईव्ह न्यूज । अंत्योदय कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी असून धान्य वितरणात जानेवारीपासून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार १५ ऐवजी २१ किलो गहू तर २० ऐवजी १४ किलो तांदूळ प्रतिकार्ड दिले जाणार आहे. केंद्र शासनाकडून आलेल्या नवीन धोरणानुसार हा बदल करण्यात आला आहे.

याचबरोबर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेला रेशन दुकानातून साखरेचा पुरवठा आता पुन्हा सुरू होणार आहे. कार्डधारकांना केवळ २० रुपये प्रति किलो दराने ही साखर वितरीत केली जाणार आहे.

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति महिना ३५ किलो धान्य दिले जात होते. त्यात बदल केला नसून गहू व तांदुळ यांचे प्रमाण कमी-अधिक केले आहे. याचप्रमाणे प्राधान्य कुटुंबधारकांना प्रति व्यक्ती ५ किलो धान्य देणार असून त्यातही धान्याच्या मात्रेत बदल केला आहे.
एकूण धान्य देण्याचे प्रमाण मागीलप्रमाणे असणार आहे. हा बदल केंद्र शासनाच्या धोरणानुसार केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात जिल्हास्तरावरून नियतन मागवण्याचे प्रस्ताव मागवले आहे. सध्या स्वस्त धान्य दुकानांवर डिसेंबरचे धान्य वाटप सुरू आहे. जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ७७५ लाभार्थी अंत्योदय कार्डधारक तर २२ लाख ५५ हजार ४६ प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी आहे.







