⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : जागतिक मंदीचे संकट, महागाई आणि पुढील वर्षी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरूवात केली आहे. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्यांच्या अपेक्षा अधिक आहेत.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात करताच काँग्रेस खासदारांनी भारत जोडो चा नारा देण्यास सुरूवात केली. थोड्याच वेळात ते शांत झाले. त्यानंतर अर्थमंत्री म्हणाल्या, अमृत काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. हा स्वतंत्र्याच्या १०० व्या वर्षी भारत कसा असेल याची पाया या अर्थसंकल्पात असेल. या अर्थसंकल्पात शेतकरी, मध्य वर्ग आणि महिलांपासून ते समाजातील सर्व वर्गाच्या विकासाचा विचार केलाय.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

आर्थिक विकास वाढीचा दर ७ टक्के इतका राहील, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात जगाने भारताची ताकद मान्य केली
यूपीआय, कोविन अ‍ॅप यामुळे जगाने भारताचं महत्व मान्य केलं
दरडोई उत्पनात दुपटीनं वाढ, आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
जी-२० अध्यक्षपद मिळणं ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट
४७.८ कोटी जनधन बँक खाती उघडली गेली.
गेल्या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगभरात दहाव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकापर्यंत विकसित झाली आहे