जळगाव जिल्ह्यात तीन वेळा झालेय अ. भा. मराठी साहित्य संमेलन; ७१ वर्षांनंतर अमळनेरला पुन्हा संधी

एप्रिल 24, 2023 2:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ एप्रिल २०२३ | साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार, साने गुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजेच जळगावच्या अमळनेरमध्ये पुन्हा साहित्य रसिकांचा मेळा भरणार आहे. ९७ वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणार आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळणे ही संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी भुषणावह बाब आहे. साहित्य संमेलन आयोजनाचा अनुभव देखील जळगाव जिल्ह्याकडे आहे. कारण याआधी १९३६ व १९८४ मध्ये जळगावला तर १९५२ मध्ये अमळनेरला साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पडले आहे. आता पुन्हा एकदा ७१ वर्षांनंतर अमळनेरला पुन्हा संधी मिळाली आहे.

Thambnail 2 jpg webp webp

अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी, प्रसिध्द उद्योगपती तथा विप्रो उद्योग समुहाचे संस्थापक अझीम प्रेमजी यांची कर्मभूमी, श्रीमंत प्रतापशेठ यांची दानभूमी, संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी आहे. अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने सर्वांना मागे टाकत अ.भा.साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळवला. गेल्या चार-पाच वर्षांपासून अमळनेर मधून प्रस्ताव पाठविण्यात येत होता. मात्र थोडक्यात संधी हुकत होती. यंदा सातारा, सांगलीतील औदुंबर, जळगावमधील अमळनेर आणि जालना या चार स्थळांची नावे चर्चेत होती. यातून जळगावची निवड करण्यात आली.

Advertisements

खान्देशला पाचव्यांदा मान
पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १८७८ मध्ये पुणे शहरात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे होते. १९३६ मध्ये २२ वे मराठी साहित्य संमेलन जळगाव शहरात झाले. माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जुलियन) त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. १९५२ मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ३५ वे संमेलन झाले. त्यानंतर १९८४ मध्ये पुन्हा एकदा जळगाव शहरात ५८ वे संमेलन पार पडले. त्या संमेलनाचे अध्यक्षस्थान शंकर रामचंद्र खरात यांनी भूषविले होते. खान्देशच्या बाबतीत बोलायचे म्हटल्यास, १९४४ मध्ये २९ वे साहित्य संमेलन धुळे येथे पार पडले. भार्गवराम विठ्ठल वरेरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. जळगाव जिल्ह्यात चौथ्यांदा तर खान्देशात पाचव्यांचा हे साहित्य संमेलन होत आहे.

Advertisements

अमळनेर शहराला ऐतिहासिक वारसा
अमळनेर हे शहर तापी नदीच्या खोर्‍यात बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे या दोन जिल्ह्याचे मिळून एकच खान्देश जिल्हा होता त्यावेळी अमळनेर हे खान्देशातील मध्यवर्ती ठिकाण होते. अमळनेर साने गुरुजी यांची ही कर्मभूमी आहे. स्वांतत्र्य लढ्यात अनेक मोहिमांची आखणी अमळनेर शहरातच आखली गेली. सुमारे दीडशे-पावणेदोनशे वर्षापूर्वी अमळनेर येथे सखाराम महाराज संत होऊन गेले. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे अमळनेरला क्षेत्र म्हणून मिळालेली प्रसिद्धी आजही कायम असून ते खान्देशचे पंढरपुर समजले जाते. याशिवाय अमळनेरात देशातील सर्वात प्रसिध्द मंगळ ग्रहाचे मंदिर आहे.

डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now