⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | टोमॅटो भाव नियंत्रणासाठी कृषी विभागाचा प्रयत्न – कृषी आयुक्तालय

टोमॅटो भाव नियंत्रणासाठी कृषी विभागाचा प्रयत्न – कृषी आयुक्तालय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२३ । सध्या बाजारांमध्ये टोमॅटोचे भाव नियंत्रणाबाहेर गेले असून भाव नियंत्रणासाठी कृषी विभाग युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. पुणे कृषी आयुक्तालयाच्या‌ वतीने नुकतीच राज्यातील कृषी अधिकाऱ्यांची यांची बैठक घेण्यात आली. टोमॅटो लागवड, उत्पन्न व भाव याबाबत अधिक वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. त्यामुळे भाव नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास मदत होणार असल्याचे पुणे कृषी आयुक्तालयाच्या‌ वतीने कळविण्यात आले आहे.

जुलै २०२३ मध्ये बाजारात टोमॅटोचे वाढलेले दर लक्षात घेता यावर सविस्तर माहिती आणि उपयोजनेसाठी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली १ ते ११ जुलै २०२३ रोजी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची बैठक झाली.

राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४२ हजार हेक्टर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असते.

सदर बैठकीत टोमॅटो पिकाखालील खरीप २०२३ हंगामातील क्षेत्र आणि उत्पादन याबाबत माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत. राज्यात डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटो ला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान ६ ते २ रुपये प्रति किलो, मार्च २०२३ दरम्यान ११ रुपये प्रति किलो व एप्रिल २०२३ ते मे २०२३ दरम्यान ८ ते ९ रुपये प्रति किलोच्या आर्थिक नुकसानीस शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

या व्यतिरिक्त मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी पाऊस, गारपीट यामुळे देखील टोमॅटो आणि इतर भाजीपाला यांचे नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून येते. चालू वर्षी पाऊस देखील जून महिन्यात जवळपास १५ दिवस उशिरा आला आणि तो सरासरीच्या जेमतेम ५४% झाला. यामुळे नवीन लागवडीस उशीर झाला असल्याचे आढळून येते. टोमॅटो पिकावरील कीड व रोग याबाबत देखील या बैठकीत चर्चा करून नवीन जाती, कीड आणि रोग प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर चर्चा करण्यात आली.

सद्या शेतकरी नविन टोमॅटोची लागवड करत आहेत याबाबत येत्या ७-८ दिवसात वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल. टोमॅटो लागवडीबाबत नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रमुख क्षेत्र असून त्या जिल्ह्यांच्या अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडून प्रामुख्याने नवीन लागवडी बाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. तो प्राप्त होताच टोमॅटो लागवड, उत्पन्न व भाव याबाबत अधिक वस्तुस्थिती स्पष्ट होईल. यामुळे भाव नियंत्रणास मदत होईल. असे कृषी आयुक्तालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.