बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

जळगाव जिल्ह्यातील जवानाला पश्चिम बंगालमध्ये आले वीरमरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ । भडगाव तालुक्यातील गुढे गावातील मूळ रहिवासी असलेले भारतीय सैन्य दलातील जवान पश्चिम बंगालच्या कंचनपुरा येथे नायक पदावर राहुल श्रावण माळी (34) यांना देशसेवा बजावताना मंगळवार, 27 रोजी वीर मरण आले.

ही घटना भडगाव तालुक्यात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. गुढे येथे ही वार्ता कळताच राहुल यांचे बंधू अविनाश माळी हे कलकत्ता येथे रवाना झाले असून शुक्रवारी सायंकाळपयंत वीर जवानाचा मृतदेह गुढे येथे आणला जाण्याची शक्यता आहे.

गुढे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान चिरंजीव राहुल श्रावण माळी हे सुमारे 14 वर्षापूर्वी देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते.

मंगळवार, 27 रोजी रात्री त्यांना कर्तव्यावर असतानाच वीर मरण आले. बराकपूरच्या आर्मी रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. वीर जवानाच्या पश्चात पत्नी, मुलगा शिव (4) व शंभू (1.5 वर्ष), वडील, आई व दोन मोठे भाऊ, वहिनी, पुतणे असा परीवार आहे. ते प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे लहान बंधू होत.