जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी बेकायदा वाळू उपशावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केलं होते. आता यावरून गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या खासदारानं मतदारसंघात साधी मुतारीही बांधलेली नाही आणि आम्हाला शिकवायला निघाले आहेत. आम्ही नारायण राणेंनाही (Narayan Rane) खपवतो, हे तर चिल्लर आहेत,’ अशा शब्दांत गुलाबराव पाटील खा. उन्मेष पाटलांवर टीकेची तोफ डागली आहे.
‘अनेक वर्षांपासून इथं भाजपचा खासदार आहे. मात्र, मतदारसंघात त्यांनी साधी मुतारीही बांधली नाही. ते मला काय शिकवणार? गिरणा परिक्रमा करण्यासाठी गिरणा नदीच्या काठावर फिरावे लागते. ही परिक्रमा म्हणजे खासदारांची स्टंटबाजी आहे. खासदार उमेश पाटलांनी माझ्या नादी लागू नये. आम्ही नारायण राणेंना खपवतो तर उन्मेष पाटील काय चीज आहे, असा सणसणीत टोला गुलाबरावांनी हाणला आहे.
‘खासदारांनी स्वत:च्या मतदारसंघात किती विकासकामं केली याबाबत परिक्रमा करावी. सात वर्षांपासून डोक्यावर ‘बलून बंधारे’ घेऊन हे फिरताहेत. २७ वर्षांपासून इथं यांचा खासदार आहे, कुठलेही कामे झालेली नाहीत. खासदार फंड आणू शकत नाहीत, शेतरस्ते देऊ शकत नाहीत. या जिल्ह्यात त्यांना कुणीही हुंगत नाही म्हणून ते गुलाबराव पाटील नावाचा जप करत आहेत, असंही गुलाबराव म्हणाले.
काय म्हणाले होते खा. पाटील?
‘पालकमंत्री गुलाबराव पाटील हे रोज ज्या रस्त्याने ये-जा करतात, त्याच परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो? तो का थांबत नाही? असा सवाल करत, कुंपणच शेत खातयं, असा आरोप खासदार उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केला होता.
हे देखील वाचा :
- चोट्या तुझ्यावर एक तरी केस आहे का? संजय राऊतांच्या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटीलांकडून समाचार
- यंदा जळगाव लोकसभेतील मतदानाचा टक्का वाढला ; कोणाला होणार फायदा?
- Loksabha Election : जळगाव आणि रावेरमध्ये 1 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले? घ्या जाणून..
- Loksabha Election : सकाळी 11 पर्यंत जळगावात 16.89 तर रावेरात 19.03 टक्के मतदान, येथे झाले सार्वधिक कमी मतदान
- नाथाभाऊ, गिरीश महाजनांच्या राजकीय वादाबाबत रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य