जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । मुळची कोलकाता आणि सध्या जळगावातील पतंग गल्ली, जोशीपेठमध्ये राहणाऱ्या मविवाह केलेल्या तुंपा बसुदेव घोरई (वय २०) या विवाहितेने १७ डिसेंबर रोजी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. तुंपा हिने माहेराहून पाच लाख रुपये हुंडा आणावा यासाठी पतीसह सासरच्या लोकांनी छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा गुन्हा शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मूळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेली तुंपा हिने बसुदेव घोरई याच्याशी प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वीच कुटुंबीयांच्या रितीरिवाजाने त्यांनी लग्न केले होते. तुंपा ही पतीसह जाेशीपेठेत राहत होती. १६ डिसेंबर रोजी रात्री पतीसह सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. हुंडा मिळाला नाही म्हणून आता माहेराहून पाच लाख रुपये आणावे अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, तिच्या आत्महत्येस पतीसह सासरचे लोक जबाबदार आहेत. अशी फिर्याद तुंपाचे वडील अलोकेश वैजनाथ पंजा (वय ५२, रा. पश्चिम बंगाल) यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार तुंपाचा पती बसुदेव सनत घोरई, सासरा सनत घोरई, सासू अर्चना घोरई, नणंद व नंदोई अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक यशोदा कणसे तपास करीत अाहेत.











