जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । चितेगाव, मुंदखेडा, पाताेंडा, ओढरे, कोदगाव ( ता. चाळीसगाव ) येथील धरणग्रस्तांनी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमाेद पाटील, पंचायत समिती गटनेते संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत तत्काळ उपाययोजना म्हणून, पुरवणी मागणी मांडून २८० कोटी रुपये तापी महामंडळास उपलब्ध करून धरणग्रस्तांना दिलासा देण्याचा शब्द, जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
यांची उपस्थिती होती
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव पाटील, शेनपडू निंबा पाटील, पातोंडा येथील प्रभाकर पवार, छोटू पाटील, जितेंद्र येवले, सुखदेव शिंपी, मुरली अहिरे, गजानन माळी, दिलीप पाटील, पांडुरंग आधार माळी, अशोक वाबळे, बी.ओ. पाटील, चितेगाव येथील निवृत्ती अण्णा कवडे, राजेंद्र कवडे, भगवान भोसले, रवींद्र होनसिंग पाटील आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
चितेगाव, मुंदखेडा, ओढरे, कोदगाव परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा मोबदला मिळण्याबाबत मंत्रालयात माजी मंत्री महाजन व आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नाने जलसंपदा मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक झाली. सर्व धरणग्रस्तांनी जलसंपदा मंत्री पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आपली व्यथा मांडली. धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नेमके कोणते व काय उपाय करता येतील आणि प्रश्न कसा सोडवता येईल, या बाबीची माहिती माजी मंत्री महाजन, आमदार चव्हाण आणि शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री पाटील यांना दिली. त्यावर यासंबंधी सर्व बाबींची पूर्तता करून येत्या आठ दिवसांत सर्व आढावा घेऊन नियोजन विभाग आणि अर्थ विभागाशी बैठक घेऊन या शेतकऱ्यांना मोबदला देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.