जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे रद्द करावे, स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव द्यावे, खते, बी-बियाणे औषधी यांच्या किमती अनुदानित दरात द्याव्यात अशा मागण्यांसाठी उद्या शुक्रवार (ता.२६) रोजी शेतकरी संघर्ष समन्वय समिती व कामगार संघटनांनी देशव्यापी बंदचे आवाहन केलेले आहे.
बंदमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा शेतमजूर युनियन, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सहभागी होणार आहे. यासह शुक्रवारी सकाळी ११ ते १ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहे, असे आवाहन आयटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन, शांताराम पाटील, राजेंद्र झा, छोटू पाटील, प्रेमलता पाटील, मिनाक्षी सोनवणे, ममता महाजन, वासुदेव कोळी, सुलोचना साबळे आदींनी केले आहे.