⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | मोसंबी फळपिक विमा संरक्षित रक्कम तातडीने अदा करावी  – खासदार उन्मेश पाटील

मोसंबी फळपिक विमा संरक्षित रक्कम तातडीने अदा करावी  – खासदार उन्मेश पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । मतदार संघातील एक प्रमुख फळ पीक म्हणून मोसंबी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि करीत आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मध्ये मोसंबी या फळपिकाच्या मृग व आंबिया बहाराचा समावेश केलेला आहे. गेल्या मोसमात झालेल्या हवामानातील बदल आणि अत्यल्प पर्जन्यमानामुळे नुकसान सहन करावा लागला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम त्वरित अदा करावी. केळी पीक विमा बाबत शेतकऱ्यांची झालेली अवहेलना मोसंबी फळपीक विमा धारक शेतकऱ्यांच्या नशिबी येऊ नये अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा वजा सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी दिला आहे.

खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी महोदयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यातील मोसंबी लागवडीखालील क्षेत्र 4200 इतके असून माझ्या जळगाव लोकसभा मतदार संघातील मोसंबी लागवडीचे क्षेत्र 3891 हे. (जळगाव – 162 हे., पाचोरा – 1891 हे., भडगाव- 952 हे., चाळीसगाव – 774 हे., पारोळा – 11 हे., अमळनेर – 11 हे., धरणगाव – 22 हे., एरंडोल – 68 हे.,) इतके आहे.

खरीप हंगाम 2021 मधले संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांसोबत चर्चेवेळी निष्पन्न झाले आहे. या अनुषंगाने मोसंबी फळ पीक (मृग बहार) विम्याचे प्रमाणके (ट्रिगर) बघितले असता माझ्या अशा निदर्शनास येते की  दिनांक.1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये कमी पाऊस झाल्यास खालील प्रमाणे नुकसान भरपाई झाल्याची प्राथमिक माहिती

(७५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाल्यास रू.४००००/-) तसेच सदरील कालावधी मध्ये (७५  मि.मी.  ते १२५ मि. मी. पाऊस झाल्यास रू.१२०००/-) नुकसान भरपाई देय असल्याचे नमूद आहे.

त्याच प्रमाणे दि.१ ऑगस्ट ते ३१  ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड पडल्यास खालील प्रमाणे नुकसान भरपाई देय असल्याचे सदर शासन निर्णयात नमूद आहे.

( सदरील कालावधीमध्ये सलग १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास व कुठलेही एक दिवसाचे तापमान ते ३३ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रू.१८०००/-  तसेच सदरील कालावधीमध्ये २१ दिवसापेक्षा जास्त सलग पावसाचा खंड पडल्यास तसेच सलग तीन दिवस ते ३३ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान राहिल्यास रू.४००००/-) एवढे नुकसान भरपाई असल्याचे नमूद आहे.या अनुषंगाने मी वरील कालावधीच्या पर्जन्यमान व तापमानाची माहिती घेतली असता बहुतांश महसूल मंडळे सदरील विमा निकषांमध्ये पात्र झालेली असून विमाधारक शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे सदरील पिकाचा विमा कालावधी संपल्यापासून म्हणजेच 31 ऑगस्ट 2021 पासून पुढील तीन आठवड्यात निकषाप्रमाणे विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याबाबत संबंधित विमा कंपनी आपण सूचित करावे. अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

वेळेत द्या अन्यथा विलंब शुल्कासह मोबदला वसूल करू 

मागील वर्षाचा अनुभव पाहता ज्या पद्धतीने विमा कंपनीमार्फत केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई झालेली होती तशी दिरंगाई आता होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत आपण विमा कंपनीचा अवगत करावे अन्यथा शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास उशीर केल्यास 12 टक्के विलंब शुल्कासह ही रक्कम अदा करावी लागेल याची पूर्व कल्पना संबंधित विमा कंपनीस देण्यात यावी जेणेकरून मागील वर्षी विमा रक्कम मिळवण्याकरता शेतकऱ्यांना झालेल्या त्रास कमी करता येईल. तरी आपण सदरील विषय याबाबत तात्काळ कारवाई कराल. अशी मागणी केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.