गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे: आमदार सुरेश भोळे

ऑगस्ट 16, 2026 4:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । समाजाने केलेला सत्कार म्हणजे प्रोत्साहन असून हा अविस्मरणीय क्षण असतो. गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलच्या क्षणिक सुखाला बळी न पडता मोबाईलचा वापर हा गरजेपुरता झाला पाहिजे. संत महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आत्मसात करून युवकांनी उच्च शिक्षण घ्यावे व मोठे अधिकारी होऊन समाजाचा नावलौकिक करावा व समाजशील नागरिक बनावे असे प्रतिपादन आ. सुरेश भोळे यांनी केले.

rajumama

जळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहात आयोजीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना बोरसे हे तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सुभाष सोनवणे, दुध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख, योगेश सोनवणे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे ,नाना बोरसे,सुभाष करे, शतायु हॉस्पिटलचे संचालक डॉ. गोपाल घोलप, संदिप तेले, रमेश सुलताने, धरणगाव एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलिप धनगर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तूळशीराम सोनवणे, दशरथ नाना लांडगे, गणेश जाने आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी भविष्यातही कष्ट, जिद्द व चिकाटी ठेऊन यश संपादन करा. समाज हितासाठी आपण काही देणं लागतो या भावनेने संस्कार जोपासत कार्य करावे असे आवाहन केले.

कार्यक्रम प्रसंगी महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर नक्की करावे. तसेच आपल्या समाजाला आपण पुढे नेण्यासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टाच्या काळात ज्यांनी साथ दिली त्यांचे ऋण नेहमी मानले पाहिजे असे सांगितले. निवृत्ती बोराडे,डॉ. गोपाल घोलप, डॉ चंद्रशेखर पाटील, अरविंद देशमुख योगेश सोनवणे आदींनी आपली मनोगते केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना बोरसे यांनी, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे, लहान मुलांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे व जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीस लागल्यास त्यांनी समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाज कार्यासाठी सदैव सहकार्य करावे असे आवाहन केले.

सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरली पाहिजे व शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा, क्रीडा, उद्योग, तंत्रज्ञान व विविध क्षेत्रांत पुढे यावे. तसेच संघटनासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे विषद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी तर तूळशीराम सोनवणे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गुणवंतांचा झाला सत्कार !

यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर तसेच डिप्लोमा, स्कॉलरशिप, नीट जेईई व व अन्य स्पर्धात्मक परीक्षा मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी, पदवीधर परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, संस्कार पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र नक्षत्र एनर्जी सोलुशनच्या संचालिका मनीषा योगेश सोनवणे यांच्या मार्फत देण्यात आले. कर्मयोगीनी प्रगती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुलताने व विजय शिरसाठ यांच्याकडून जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर लिखित पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now