जळगाव लाईव्ह न्यूज । केळीच्या बाजारपेठेत सध्या मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन निर्माण झाल्याने केळीचे दर अग्रेसर पातळीवर टिकून आहेत. आवक मर्यादित असल्यामुळे गत महिन्यापासून बुऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोर्डावर दाखल होणाऱ्या गाड्यांची तात्काळ विक्री होत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात केळी भावात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

केळीचे प्रमुख उत्पादन क्षेत्र असलेल्या रावेर आणि यावल भागातून अपेक्षेपेक्षा कमी आवक होत आहे. दुसरीकडे स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठांतून मागणी स्थिर आहे. परिणामी व्यापाऱ्यांमध्ये खरेदीसाठी चढाओढ दिसून येत असून त्याचा थेट फायदा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. सध्याच्या परिस्थितीत आवक वाढण्याची शक्यता कमी असल्याने येत्या काही दिवसांतही दरात मोठी घसरण अपेक्षित नसल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे.

चोपडा, जामनेर आदी भागांतून नवती केळीची आवक सुरू झाली आहे. दरवर्षी गुढी पाडव्यापासून रावेर-यावल परिसरातून नवती केळीची आवक वाढते. उत्तर भारतात थंडी कमी होत असल्यामुळे तेथील मागणीतही वाढ होत असल्याचा अनुभव शेतकरी व्यक्त करत आहेत. मागणी व पुरवठा यातील संतुलन कायम राहिल्यास दरातील स्थिरता पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.सध्याची परिस्थिती केळी उत्पादकांसाठी दिलासादायक ठरत असून बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र आहे.
सध्या असा आहेत केळीचा भाव?
रावेरचे केळी भाव – नवती १९५० ते २०५० रुपये प्रति क्विंटल, नवती २- १९०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत
बुऱ्हाणपूरचे केळी भाव – नवती २००० रुपये , मध्यम १८५० ते १९००, आणि कमी दर्जाचे १३०० ते १४०० रुपये प्रति प्रति क्विंटल असा आहे.







