जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या आणि सकाळच्या गारव्यामध्ये घट होत असून दुपारच्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या जळगावचे किमान तापमान १४ तर कमाल तापमान ३२ अंशांवर पोहोचले आहे. आता आगामी दोन तीन दिवसात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असून दिवसाचा पारा ३४ अंशापर्यंत जाईल. तर रात्रीचा पारा १४ ते १६ दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात जाणवणारी थंडी आता कमी झाली असून सकाळी आणि रात्री सौम्य गारवा राहतो आहे. मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढू लागला असून उकाडा जाणवत आहे.आता हिवाळ्याची तीव्रता कमी होत चालली असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पुढील काही दिवसांत दिवसाचे तापमान हळूहळू वाढत जाणार असल्याने जळगावकरांना उकाड्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. एकूणच, जळगाव जिल्ह्यात आता थंडीची माघार सुरू झाली असून उन्हाळ्याच्या आगमनाची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे.
थंडी कमी झाल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर कमी केला असून हलक्या कपड्यांकडे कल वाढला आहे. रब्बी पिकांवर तापमानातील वाढीचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शेतकरी सतर्क झाले आहेत.








