जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२५ । राज्यात पावसाचा जोर कायम असून आज ३० रोजी जळगावसह राज्यातील काही जिल्ह्याना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. सततच्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसताना दिसत असून पुढील चार दिवस पावसाचा जोर ओसरणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय.

सध्या अंदमान निकोबार बेटांवर वाऱ्यांचे जोरदार प्रवाह सक्रिय आहेत. हे प्रवाह आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या किनारपट्टी भागासह कोकण व गोवा भागात वेगाने वाहत आहेत. त्यामुळे ईशान्य अरबी समुद्रात वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे ताशी 40 ते 50 प्रति तास वेगाने वाऱ्याचा वेग आहे. दरम्यान हवामान खात्यानं आज संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावसह छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय .

उद्यापासून राज्यभरातलाच पावसाचा जोर ओसरणार आहे. केवळ तळ कोकणात हवामान विभागाने पावसाचे अलर्ट दिले असून सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह ठाणे पालघर व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. यात अधून मधून जोरदार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे खरीप पिकांना फटका बसत आहे.त्यात गणेशोत्सव सुरू होऊन दोन दिवस होऊन गेले. मात्र या दोन्ही दिवस नागरीकांना पावसामुळे गणेश मंडळांचे देखावे पाहण्याची संधी मिळाली नाही.आज शनिवारसाठी हवामान विभागाचा ‘येलो अलर्ट’ जारी केलेला आहे. येलो अलर्टनुसार पावसाची शक्यता शनिवारी दुपारी किंवा सायंकाळी जोरदार पावसाची शक्यता आहे.








