जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२५ । बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मॉन्सूनला पुन्हा एकदा जोर मिळालेला आहे. मागच्या दोन तीन दिवसात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायाला मिळाले. अशातच हवामान खात्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना आगामी तीन-चार दिवस पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात आजपासून आगामी तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत देखील पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता असून, या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


दरम्यान, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत तुरळक पावसाबरोबर विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कायम राहतील.
जळगाव जिल्याला आगामी तीन दिवस अलर्ट
दरम्यान जळगाव जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात आजपासून २९ ऑगस्टपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान, वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे








