जळगाव लाईव्ह न्यूज । केळी व्यापाऱ्याच्या मनमानी कारभाराचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसत असून शेतकऱ्याच्या केळी पिकाला फलक भावानुसार (जाहीर दर) दर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. बऱ्हाणपूर व जळगाव येथील केळीच्या भावात मोठी तफावत दिसून येते.

बोर्ड भावापेक्षा ४०० ते ५०० रुपये कमी दराने व्यापारी केळी खरेदी करीत आहे. एकंदरीत केळी पिकवणारा शेतकरी नाडला जात असल्याची कैफियत शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मांडली. भावाच्या संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी २९ रोजी बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

केळी विक्री व व्यापाराच्या संदर्भात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे. शेतकऱ्यांचे काही फसवणुकीचे प्रकार घडले असल्याचे शेतकऱ्यांनी मंत्री महाजन यांची भेट घेऊन सांगितले. शेतकऱ्यांची भावना व अडचणींबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, गोपाल भंगाळे, राजेंद्र सोनवणे, हर्षल चौधरी यांनी मार्ग काढण्याची मागणी केली.
या वेळी मंत्री महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा करून या समस्यांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली. नुकसानीबाबत आक्रमक पवित्रा घेत २९ ऑगस्ट रोजी भुसावळ येथे जळगाव व बहऱ्हाणपूर जिल्ह्यातील कृषी तज्ज्ञ व शेतकरी प्रतिनिधींची बैठकीच्या सूचना दिल्या आहेत.








