जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२५ । मागील आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जळगाव जिल्ह्यातही मोठ्या खंडानंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळं जिल्ह्यातील काही ठिकाणी नदी नाल्याने ओसंडून वाढत होते तर काही ठिकाणी तर या जोरदार पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात आजपासून धो धो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जळगावसह राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, हलक्या सरी अधूनमधून कोसळताना दिसत आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी शनिवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. मागच्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. तर काही ठिकाणी नदीचे पाणी शेतात शिरल्याने खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले.

नुकसानग्रस्त शेतकरी पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी करत असताना हवामान खात्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज वर्तविला आहे. ‘आयएमडी’च्या अंदाजानुसार आजपासून दि.२४ ते २८ ऑगस्ट दरम्यान जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र दि.२८ व २९ रोजी जिल्हाभरात दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे खरिपाच्या पिकांना पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे.








