जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२५ । श्रावण महिन्यात केळीला मोठी मागणी होती. यादरम्यान मागील काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील केळीला प्रति प्रतिक्विंटल २ हजाराहुन आधीच दर मिळाला होता. आता श्रावण महिना संपला असला तरी केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असताना, स्थानिक व्यापाऱ्यांनी एकजूट करून केळीचे भाव मोठ्या प्रमाणात खाली आणून शेतकऱ्यांची एक प्रकारे कोंडी केली आहे. यामुळे केळी उत्पादकांमध्ये संतापाची लाट आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात निर्यातक्षम केळीला २३०० ते २४०० रुपये, तर स्थानिक केळीला १९०० ते २००० रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. परंतु, आज स्थानिक केळीला ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल व निर्यात होणाऱ्या केळीला अवघा ११०० ते १२०० रुपये भाव मिळत आहे. दर कमी झाल्याने मोठा आर्थिक फटका केळी उत्पादकांना बसला आहे.

घसरल्यानंतर शेतकऱ्यांना एका गाडीमागे (१५० क्विंटल) एक लाख रूपयांपेक्षा जास्त आर्थिक झळ बसली आहे. भाव वाढत असताना शेतकरी आणखी चांगल्या भावाच्या आशेने इतके दिवस केळीची कापणी करत नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात भाव कमी झाल्यानंतर शेतकरी आता आणखी भाव कमी होण्याच्या भीतीने केळी कापणीसाठी घाई करू लागले आहेत.
गेल्या पंधरवड्यापासून जामनेर, चोपडा, चाळीसगाव, नांदेड, सोलापूर तथा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, बडवानीसह उत्तर प्रदेश, गुजरात व आंध्र प्रदेशातील केळीचीही आवक वाढली आहे. तरीही, केळीबाजारात मंदी असल्याचे धूसर केळी व्यापाऱ्यांनी निर्माण केले आहे. केळीच्या बाजारपेठेत मंदी असती, तर केळीमालाची मागणी व त्या प्रमाणात केळी मालाचा उत्तर भारतात पुरवठा करणाऱ्या वाहनांची संख्या स्थिर राहिली नसती, असं मत जाणकार व्यक्त करीत आहेत.








