जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे खरीप हंगामात शेतकरी पिकांसाठी रासायनिक खत, फवारणी मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. मात्र यातच शेतकऱ्यांचा फायदा घेऊन काही कृषी केंद्राकडून नियमाचे उल्लंघन केलं जात असल्याचं दिसून आले. त्यातच शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून जळगाव जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली.

विविध कारणास्तव कृषी विभागाने एप्रिल महिन्यातच १९ कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे, तर २ विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली असून, सुधारणा न झाल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विकास बोरसे यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रांच्या तपासणीत अनियमितता तसेच नियमांचे उल्लंघन आढळले होते. काही परवाने तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने मार्च महिन्यापासून कृषी केंद्रांची तपासणी सुरू झाली आहे. अनियमिततेसह अन्य बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्या.







