जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ । कोरोनामुळे राज्यातील एसटीची सार्वजनिक प्रवासी सेवा बंद होती. त्यामुळे एसटीला ८ हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्नाचा फटका बसला; मात्र बेस्ट उपक्रमातील प्रवासी सेवेमुळे काही प्रमाणात एसटी महामंडळाला उत्पन्न मिळवता आले; मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव संपत आला असल्याने आता ही सेवा आज १३ जूनपासून पूर्णपणे बंद होणार असल्याची घोषणा एसटी महामंडळ प्रशासनाने केली आहे. त्यामुळे एसटीतील सेवारत कर्मचाऱ्यांना आता परत बोलावण्यात येत आहे.
टप्प्याटप्प्याने बसेसची संख्या कमी केल्यानंतर सध्या फक्त २५० बसेस बेस्ट उपक्रमात सेवा देत होत्या. त्याही १३ जूनपासून आपापल्या डेपोत परत पाठवण्याच्या सूचना एसटी महामंडळाने दिल्या आहेत. यातून आतापर्यंत सुमारे ३५० कोटींचे उत्पन्न एसटी प्रशासनाला मिळाले आहे. तर जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांची ‘बेस्ट’ सेवा दीड महिना आधीच संपवण्यात आली होती.