जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील काही धरणांमधील जलसाठा वाढला आहे. यातच नाशिकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अर्धा जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज (८ जुलै) सकाळपर्यंत गिरणा धरणाचा (Girna Dam) जलसाठा ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, गिरणा पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यदृष्टीमुळे आवक वेगाने सुरू असल्याने हा साठा लवकरच ५० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

सोमवारी (दि ७ जुलै) सकाळी गिरणा धरणातील जलसाठा ४१.१८ टक्क्यांवर होता. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे गिरणा धरणाच्या वरच्या भागात असणाऱ्या चणकापूर, पुनद, केळघरसह अन्य प्रकल्पांत मोठा जलसाठा उपलब्ध झाला आहे. जुलै महिन्यातच या प्रकल्पातील जलसाठा सरासरी ओलांडत असल्याने संबंधित प्रशासनाने केळघर आणि ठेंगोळा प्रकल्पांतून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा धरणात सुरू आहे.

आज सकाळपर्यंत गिरणा धरणात ४४.२७ टक्क्यावर पोहोचला आहे. विशेष गेल्या वर्षीय आजच्या दिवशी गिरणेत ११.७४ टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र यंदा जोरदार पाऊस झाल्याने गिरणा धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सध्या गिरणा पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यदृष्टीमुळे आवक वेगाने सुरू पुढील २४ तासात गिरणा धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे आगामी काळात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.








