⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

शंभर कोटीमधील ८० टक्के रस्त्यांच्या कामांना अमृतचा अढथळा !

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । महाराष्ट्र राज्य शासनाकडून जळगाव शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. मिळालेल्या या मंजुरीमुळे नागरिक सुखावले आहेत. कारण रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. मात्र त्या २६७ रस्त्यांच्या कामांना अमृत २.० चा अडथळा आला आहे.शंभर कोटीमधील ८० टक्के रस्त्यांच्या कामांना अमृत २.० चा अडथळा निर्माण झाला आहे. जळगाव शहरातील पाच पैकी तीन झोनमधील मलनिस्सारण योजनेचे काम अपुर्ण आहे.यामुळे ते रस्ते होणे कठीण बाब बनली आहे. अशी माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.

अधिक माहिती अशी कि, अमृत योजने अंतर्गंत पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजना मंजूर आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून हे काम सुरु आहे. ज्यातील पुरवठाचे काम ९५ टक्के पुर्ण झाले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र दुसरीकडे मलनिस्सारणचे ८० टक्के काम अद्यापही बाकी आहे.पर्यायी अशा ठिकाणी रस्त्यांचे काम करणे शक्य नाहीये.

मात्र अश्यावेळीही रस्त्याची कामे केलीच तर मात्र मलनिस्सारण योजनेच्या कामासाठी पुन्हा हे रस्ते खोदावे लागणार आहेत. यामुळे शासनाचा पैसा पुन्हा खड्यात जाणार आहे आणि नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करत मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

शंभर कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील २६७ रस्त्यांच्या काँक्रिटीकरण करण्याचे काम मंजुर झाले आहे. परंतु सदर रस्ते काँक्रिट झाल्यानंतर वर्षभरात मलनिस्सारणच्या पाईपलाईनसाठी खोदले तर, त्या रस्त्यांची दुरुस्ती होणार नाही, त्यामुळे डांबराचे रस्ते घ्यावे, असे मत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी महासभेत मांडले होते.