जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२५ । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे प्रत्येकी ०.५० मीटरने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे.

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात बऱ्हाणपूर – ४.०, देढतलाई – १८.४, टेक्सा – ३.४, एरडी ०.६, गोपालखेडा ४.२, चिखलदरा ४४.०, लखपुरी ७.२, लोहारा – ३.४, अकोला – ३.२ अशी एकूण ८८.४ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली असून, सरासरी पर्जन्यमान ९.८ मि.मी. इतके आहे.

गुरुवारी पावसाची १ मि.मी., तर यंदाच्या हंगामात एकूण पावसाची १९२ मि.मी. नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे. हतनूरच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत अधिक पावसाची शक्यता आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.







