जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच चाळीसगाव तालुक्यात झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असून या घटनांमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली.

पहिला अपघात चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावरील हिरापूर गावाजवळ घडला. यामध्ये भरधाव आयशर वाहनाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली.या अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही हिरापूर या गावातील रहिवासी आहेत. एकाच गावातील तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

तर दुसरा अपघात चाळीसगावच्या कन्नड घाटाजवळ झाला. यामध्ये अहिल्यानगरमधील शेवगाव येथील भाविक उज्जैनला दर्शनासाठी जाताना कन्नड घाटात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटली झाली. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले. या अपघातात शेवगाव येथील तुकाराम रामभाऊ अंभोरे (27), शेखर रमेश दुर्पते (31) आणि घनशाम रामहरी पिसोटे (30) यांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.











