जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२५ । मागच्या दोन दिवसात झालेल्या वादळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील १० तालुक्यातील ३२० गावांना फटका बसला असून येथील सुमारे ७ हजार ७०४ शेतकऱ्यांच्या पिकाला वादळी फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. मागील दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने जळगाव, चाळीसगाव व चोपडा तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. वादळासह पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. या पावसाचा फटका ३२० गावांना बसला असून ७ हजार ७०४ शेतकऱ्यांचे ६ हजार ३९० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा फटका जळगाव जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला आहे. त्यात चाळीसगाव, जामनेर, भडगाव, पाचोरा, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, चोपड़ा तालुक्याचा समावेश आहे. तर पारोळा, अमळनेर, धरणगाव, भुसावळ व एरंडोल तालुक्यातील पिकांना कुठलाही फटका बसलेला नाही. दरम्यान नुकसानीनंतर तलाठी, मंडळाधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सामूहिक पंचनामे केले. त्याचा प्राथमिक अहवाल येणे बाकी आहे.