⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

गुलाबराव पाटलांनी पुन्हा डागली नारायण राणेंवर तोफ ; वाचा काय म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । शिवसेने नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुन्हा तोफ डागली आहे. शिवसेना असं रसायन आहे की, ज्यामुळे अगदी सामान्य लोकही आमदार, खासदार आणि मंत्री झाले. अगदी सायकल चोरणारे नारायण राणे यांनाही मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, शिवसेनेमुळे टोपली फिरवणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, मुरारी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणार गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून उभा आहे. हे सोडा, पण सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, असे गुलाबराव पाटील यांनी यांनी म्हटले.

राज्यातील माहाविकात आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते असा दावा भाजपकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं सत्ताधारी सांगत असतात. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे. सरकार काहीही केलं तर कोसळणार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दखला देत विरोधकांना घेरलं. गुलाबरावांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

मला माहिती आहे, गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागत. कुठलंही काम करायचं असेल तर पात्रतेसाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. पण शरद पवार यांनी असं काही केलं की, बिना लायसन्सचा ड्रायव्हर थेट व्होल्वो गाडीवर बसवला. उद्धव ठाकरे ड्रायव्हर, अजित पवार कन्डक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी झाले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की हा ड्रायव्हर अपघात करेल. ज्याने आयुष्यात गाडी चालवली नाही त्याला थेट व्होल्वो गाडी देण्यात आली. पण दोन वर्षामध्ये किती टेकड्या, पहाड आले. तरीही आमची तीन लोकांची गाडी सुस्साट चालत आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.