⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

भाजपला खिंडार : २०० गोर बंजारा समाजबांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा कायम असून भाजपाचे नुकताच पाचोरा तालुक्यातील तालुका संस्कृती आघाडीचे अध्यक्ष विजय राठोड यांच्या नेतृत्वात आंबेवडगाव, आंबेवडगाव तांडा नंबर एक व दोन, कोकडी तांडा, जोगे तांडा येथील गोर बंजारा समाज बांधवांसह सुमारे २०० कार्यकर्त्यांचा भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ.किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे कट्टर समर्थक अमोल पाटील, बबलू तडवी, नितीन निकम, नवल राठोड यांचेसह अनेक तरुणांनी भाजपाला रामराम करत शिवसेनेत दाखल झाले. भाजपाच्या तालुका संस्कृती आघाडीचे अध्यक्ष विजय राठोड यांच्यासह सुमीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत, किसान सेनेचे अरुण पाटील, डॉ.दिलीप राठोड, उत्तमशेठ राठोड, अशोक गायकवाड, भोला पाटील, संजय देवरे, विनोद पाटील, डॉ.श्यामकांत पाटील, लखन राठोड, श्रीराम राठोड, प्यारेलाल पवार, खुशाल राठोड, शिवदास जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेचा भगवा रुमाल घालत आ.किशोर पाटील यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले. भाजपा पक्षात काम करत असताना कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळू शकत नाही, याची जाणीव झाल्याने कार्यकर्त्यानी शिवसेनेची वाट धरली असून आ.किशोर पाटील यांचे नेतृत्वात गोर बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.किशोर पाटील यांचे नेतृत्वात समाजबांधव सर्वोतोपरी प्रयत्नरत राहणार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

आ.किशोर पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, विजय राठोड यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात नवतरुणांना मोलाचे मार्गदर्शन करून नवतरुणांच्या समस्या जाणून घेतल्या असून या सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे. आपल्या भागातील तरुणांना युपीएससी-एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे साहित्य प्रत्येक खेड्यात तरुणांना उपलब्ध करून दिले. नवतरुण यांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी याबाबत विजय राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन करत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच शिवसेना पक्षात कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखत लवकरच गोर समाज बांधवांचा भव्य मेळावा घेणार असल्याचे सूतोवाच दिल्याने गोर बंजारा समाज बांधवात आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रवेश सोहळ्याने भाजपाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.