⁠ 
बुधवार, मे 8, 2024

राज्यात पुन्हा लोडशेडिंग होणार का? जळगावात ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी केला ‘हा’ दावा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । गेल्या महिन्यात राज्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे लोडशेडिंगचा सामना करावा लागत होता. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून वीजपुरवठा सुरळीत सुरु असून यापुढे पुन्हा भारनियमन सुरु होणार का? असा प्रश्न राज्यातील जनतेला सतावतोय.मात्र, अशातच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. गेल्या २० ते २५ दिवसांपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात भारनियमन होत नसल्याचा दावा केला असून पुढेही लोडशेडिंग होणार नसल्याचे ते म्हणाले.

नितीन राऊत हे आज शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. आज दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील विश्रामगृहात ऊर्जामंत्री राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘राज्यातील विविध ठिकाणी वीज भारनियमनाबाबत अनेक संभ्रम आहेत. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारले असता त्यांनी राज्यात कुठेच गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून कुठेच भारनियमन नाही. भारनियमनाबाबत राज्यात नुसत्याच वावड्या उठवल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीत कुठेच भारनियमन नाही व यापुढे राज्यात कुठेच भारनियमन होणारही नाही असा विश्वासही यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.

ऊर्जामंत्री प्रवेश येताच विश्रामगृहाची बत्ती गुल
दरम्यान, ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे सकाळी भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील पूर्णा विश्रामगृहात ऊर्जा मंत्री येताच विश्राम गृहाची बत्ती गुल झाली होती. ओव्हरलोडमुळे पूर्णा विश्रामगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली. ऊर्जा मंत्र्यांसमोर वीज पुरवठा खंडित झाल्याने दिपनगर प्रशासनाची तारांबळ उडाली.

यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना सद्यस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादावर प्रश्न विचारला असता या प्रश्नाला बगल देत ऊर्जामंत्री राऊत यांनी काढता पाय घेतला. याबाबत मला कुठलीही माहिती नसून माहिती घ्यावी लागेल असे उत्तर त्यांनी दिले.