⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचे ‘पंचक’

जळगाव लाईव्ह न्यूज ।२० सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील केळी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातल्या केळींना असलेल्या विशिष्ट चवीमुळे संपूर्ण जगामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातील केळ्यांना मोठी मागणी असते. मात्र हेच केळी उत्पादक शेतकरी आता संकटात सापडले असल्याचे निदर्शनास येत आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या संकटात आहेत. यात पाऊस, अस्थिर बाजार भाव, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, यामुळे उत्पादक चिंतीत झालेले आहेत. यात नवीन भर म्हणून सीएमव्हीं केळी पिकावरील करपा या सर्व आजारांमुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

२०१६ पर्यंत करपा रोगावरील औषध हेक्टरी मागे शेतकऱ्यांना केवळ दोनशे रुपयात मिळत होते. मात्र 2016 नंतर हे औषध मिळत नाहीयेत. यामुळे शेतकऱ्यांना हेच औषध महागड्या दरात विकत घ्यावी लागत आहेत. अशावेळी शेतकरी हवालदिल झाले असून पुन्हा या औषधाचे अनुदान मिळेल अशी अपेक्षा करत आहेत.

तर दुसरीकडे बांधावरील केळीला मोठा बाजारभाव मिळत असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या शेतात थेट गाडी पोहोचत असते त्यांनाच चांगला बाजारभाव मिळतोय. तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात गाडी पोहोचत नाही त्या शेतकऱ्यांना मात्र 200 ते 500 रुपयांपेक्षा कमी दराने बाजार भाव मिळत आहे. अशावेळी या परिसरात रस्ते होणे अतिशय गरजेचे आहेत.

तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन होत असताना देखील क्लस्टर मध्ये तमिळनाडूमधील थेनी व आंध्र प्रदेशातील अनंतपुरम या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आले होते. परंतु पुढील टप्प्यात जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात येईल असे केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले होते मात्र दीड वर्षे उलटूनही जिल्ह्याचा क्लस्टर मध्ये समावेश झालेला नाही. अशावेळी शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.