⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट : वाचा संपूर्ण बातमी

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । संपूर्ण राज्यात यंदा पावसाने थैमान घातले होते. मात्र मान्सून परतल्यानंतर पाऊस थांबला आहे. मात्र नोव्हेंबरमध्ये तो पडू शकतो असे म्हटले जात आहे.नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी पाऊस पडतो. यामुळे यंदा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडणार आहे असा अंदाज आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली या जिल्ह्यांत सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज आहे. सोलापूर व उर्वरित मराठवाडा व संपूर्ण विदर्भातील १८ जिल्ह्यांत मात्र दरवर्षीच्या नोव्हेंबरमधील सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस होईल असे म्हंटले जात आहे.

याच बरोबर संपूर्ण राज्यात थंडी वाढणार असल्याचं मत हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आले आहे. तज्ज्ञांनी लावलेल्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात पाऊस ओढ देणार असतानाच कडाक्याची थंडी पडणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत किमान तापमान खाली घसरणार आहे. त्यामुळे यंदाचे वर्षे पुन्हा एकदा हुडहुडीचे ठरणार आहे.

संपूर्ण राज्यात दुपारी ३ वाजेचे कमाल तापमान हे दरवर्षी असणाऱ्या सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असेल. तर खूप ऊन पडणार नसले तरी दुपारचे तापमान उबदार असणार आहे. असे म्हटले जात आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर व विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांत पहाटे ५ वाजेचे किमान तापमान नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी असणाऱ्या सरासरी किमान तापमानापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.