⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

महाराष्ट्रात गारपीटसह अवकाळीचा धुमाकूळ ; जळगावसाठी पुढचे 72 तास महत्वाचे..

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२३ । सध्या महाराष्ट्रातील विविध भागात गारपीटसह अवकाळी पाऊस (Unseasonal rain in Maharashtra) धुमाकूळ घालताना दिसत आहे. काल गुरुवारी राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. जळगाव जिल्ह्यातील देखील काही तालुक्यांमध्ये गारपीट तर काही ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, हवामान खात्याकडून आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. हवामान खात्यानं आधीच राज्यातील विविध भागात गारपीटसह वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काल गुरुवारी राज्यातील जळगाव जिल्ह्यासह काही जिल्ह्यांमध्ये गारपीटसह वादळी पावसाने तडाखा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि भुसावळ तालुक्यात गारपीट तर अमळनेर, रावेरसह काही ठिकाणी वादळी पावसाने झोडपून काढलं आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील पहुर, वाकोद वाकडी, फतेपूर या परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस झाला.

चांदी पुन्हा वधारली ; आजचा भाव तपासण्यासाठी येथे क्लीक करा

गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात अधूनमधून वादळी पाऊस, गारपिटीची मालिका सुरू आहे. जळगाव जिल्ह्याला पुढचे तीन दिवस महत्वाचे राहणार आहे. जिल्ह्याला आजपासून 30 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आधी झालेल्या अवकाळीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यातून शेतकरी सावरत नाही त्यातच अवकाळीचा आणखी तडाखा बसण्याची शक्यता आहे.

आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी
पश्‍चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची स्थिती कायम असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हवामान खात्याने पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गाटपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

वाचा आज तुमची राशी काय म्हणते.. येथे क्लीक करा