जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे एक दुर्दैवी घटना समोर आलीय. जिथे पाणी भरण्यासाठी मोटार सुरु केली असताना विजेचा जोरदार झटका लागून महिलेचा मृत्यू झाला. दीपाली चेतन तायडे (वय २५) असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव असून मात्र महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर घातपात केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

या घटनेबाबत असे की, भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील दीपाली तायडे या सकाळी पाणी भरत असताना, वीज पंपाला धक्का लागून खाली कोसळल्या. घरच्या मंडळींच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेत शेजाऱ्यांच्या मदतीने दीपालीला तत्काळ भुसावळच्या खासगी रुग्णालयात आणले. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. तर याबाबत माहिती मिळताच भादली येथे माहेरच्या मंडळींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला. तर त्यांनी मुलीचा मृत्यू आकस्मिक नव्हे, तर घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला. महिलेच्या पश्चात पती, चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.






