जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । राज्यात सत्ता बदल झाल्या पासून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. दरम्यान यंदाचा होणारा दसरा मेळावा देखील दोन ठिकाणी होणार आहे. यामुळे शिवसेना खरी कोणती ? असा प्रश्न सर्वांनाच पडला असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. आमच्याकडे संख्या आहे आणि आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे लोक असल्याचंही ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले कि, सभेची मी तयारी पाहून आलो आहे. मोठ्या उत्साहात सभेची तयारी सुरू आहे. मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक येतील. त्यांना कोणतीही समस्या येऊ नको यासाठी काम केलं जात आहे. ही सभा यशस्वी होणार आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. मैदान कोणतंही असो विचार महत्त्वाचे आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहोत असे शिंदे म्हणाले.
लोकशाहीमध्ये संविधान, कायदा असतो. त्यानुसारच गोष्टी होत असतात. बहुमतालाही महत्त्व आहे. आमच्याकडे ५५ पैकी ४० आमदार आहेत.. १८ पैकी १२ खासदार आमच्याकडे आहेत. देशातील ४० राज्यांचे प्रमुख आमच्यासोबत आहेत. लाखो लोक आमच्यासोबत आहोत. स्पष्ट बहुमत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.