जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याची मागणी वाढली असून याच पार्श्वभूमीवर शहरात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रभागांमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

जळगाव शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, अनेक प्रभागांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आयुक्तांना पत्र दिले.

बहुतांश प्रभागांत नवीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून, नागरिक सध्याच्या दोन दिवसाआड पाणी पुरवठ्यातील अंतर कमी करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे ज्या भागात योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, तिथे किमान एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महापौरांनी केली.

महापौरांच्या या पत्राची दखल घेत आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अमृत योजनेचे काम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या भागात तातडीने फेरनियोजन करून पाणीपुरवठ्याचे दिवस सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उन्हाळ्याच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे जळगावकरांना मोठा दिलासा मिळणार असून, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.









