⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले ; इतक्या गावांना टँकरने होतोय पाणीपुरवठा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानाचा पारा ४२ अंशावर गेल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. दरम्यान उन्हाचा पारा वाढताच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. विहिरी आणि जलस्त्रोत आटल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १७७ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यात ११५ गावांमध्ये १३५ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून पाणीटंचाई निवारणार्थ ६२ गावांना ८१ शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई चाळीसगाव तालुक्यात आहे. तेथे ३२ गावांना ४५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जळगाव तालुक्यात वराड, लोणवाडी बुद्रुक, सुभाषवाडी, नाडा, शिरसोली येथे टँकरने पाणीपुरवठा होतो आहे.भुसावळ तालुक्यातील कंडारी हे गाव टँकरग्रस्त गाव आहे. जामनेर तालुक्यात रोटवद, मोरगाव या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. पारोळा तालुक्यातील खेडीढोक, हनुमंतखेडे ही गावे टँकरग्रस्त आहेत. भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी, आंचळगाव ही गावे टैंकरग्रस्त आहेत. अमळनेर तालुक्यातील तळवाडे, शिरसाळे, निसडी, लोणपंचम, नगाव खुर्द, देवगाव देवळी, सबगव्हाण, भरवस, अंचलवाडी, आटाळे, पिंपळे खुर्द, चिमणपुरी, डांगर बुद्रुक, नगाव बुद्रुक, आर्डी अनोरे, गलवाडे बुद्रुक, लोणचारम तांडा या सोळा गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ तात्पुरती पाणीपुरवठा योजना, नवीन विंधन विहीर, नवीन कुपनलिका, विहीर खोलीकरण व नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती या उपाययोजना केल्या जात आहेत.

चाळीसगावात ३२ गावांना टँकरने पाणी
जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई चाळीसगाव तालुक्यात आहे. तेथे ३२ गावांना ४५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राम्हणशेवगे, घोडेगाव, हातगाव, भिल्लवस्ती, पिंप्री बुद्रुक, खराडी, डोणदिगर, तळेगाव, न्हावे, ढो ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभुज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोदे प्र.दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा या गावांचा समावेश आहे.

या ठिकाणी विहीरी केल्या अधिग्रहीत
जिल्ह्यात ११५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. चाळीसगाव तालुक्यातील ३८ गावांत ४७ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या. अमळनेर तालुक्यात ३१ गावांत ३७ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. धरणगावात दहा गावांत ११ विहिरी, जामनेरात ७ गावे, एरंडोल तालुक्यात सहा गावांत सात विहिरी, भुसावळ तालुक्यात दोन, मुक्ताईनगर तालुक्यात चार, भडगावमध्ये दोन, पारोळ्यात सात, बोदवड व रावेरमध्ये प्रत्येकी एक विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे.