जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ती मध्य रेल्वेतर्फे नागपूर ते नाशिक रोड दरम्यान दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष ही गाडी भुसावळ, जळगाव स्थानकावर थांबणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे

या गाड्या २३ व २४ जुलै रोजी धावणार आहेत. गाडी क्र. ०१२०६ ही एकेरी विशेष अनारक्षित गाडी २३ व २४ जुलैला नागपूरहून सायंकाळी ७:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता नाशिक रोड स्थानकात पोहोचेल. नागपूर ते नाशिक यादरम्यानच्या विविध महत्वाच्या स्थानकांवर तिचे थांबे असणार असल्याने त्या-त्या भागातील प्रवाशांसाठीही या गाडीचा लाभ होणार आहे.

या महत्वाच्या स्थानकांवर असेल थांबे
नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड ला या गाड्या थांबणार असल्याने विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे. खासकरून नाशिकमधील यात्रा, व्यापारी तसेच धार्मिक पर्यटनामुळे होणारी गर्दी नियंत्रित करण्यास या गाड्यांमुळे मदत होणार आहे.

१८ अनारक्षित कोच
या गाडीमध्ये एकूण १८ अनारक्षित कोच असतील. त्यात १६ सामान्य तर २ एसएलआरडी कोचचा (गार्डसह लगेजची वाहतूक करणारे कोच) समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, ही गाडी पूर्णतः अनारक्षित स्वरूपात असल्यामुळे अगदी ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनाही या गाडीचे तिकिट काढता येणार आहे. या गाडीला ऑनलाईन रिझर्वेशनची सुविधा नसल्यामुळे रेल्वे स्थानकावरच जाऊन तिकिट काढता येणार आहे.



