जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा गजबजणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार दि. ४ ऑक्टोबरपासून जळगाव जिल्ह्यातील ७९७ शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना
शाळा सुरु केल्यानंतर शाळा सुरु केल्याचा अहवाल केंद्र प्रमुखांनी शिक्षण विस्तार अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी द्यावा. कोवीड-१९ चा प्रादुर्भाव पाहता आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणी संदर्भात दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
सोमवारपासून शाळा सुरु होणार असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार दि. २ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यावी, यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शिक्षकाची १०० टक्के उपस्थिती
शाळांमध्ये शिक्षकांची १०० उपस्थिती राहणार असून शिक्षकांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ७० टक्के शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असून उर्वरित शिक्षकांना शाळा सुरु झाल्यापासून ८ दिवसाच्या आत लस घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे समजते.