⁠ 
रविवार, मे 19, 2024

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने केळीचा भाव क्विंटल मागे ‘इतक्या’ रुपयांनी वाढला ; शेतकऱ्यांना दिलासा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२४ । गेल्या काही दिवसापासून केळीचे दर कोसळत गेल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. घसरलेल्या केळीच्या भावाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि बऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेताच एकाच दिवसात केळी भावाने लिलावात क्विंटल मागे तब्बल ३५० रुपयांची उसळी घेतली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

बऱ्हाणपूर बाजार समितीच्या दरावर महाराष्ट्रातील बाजार अवलंबून असतो. रावेरची बाजार समिती बऱ्हाणपूरचे दर पाहून शेतकऱ्यांशी चर्चा करते आणि त्यानंतर दर निश्चित केला जातो. म्हणून बऱ्हाणपूरच्या बाजार समितीत केळी दराला आवर घालणारी व्यापाऱ्यांची एक यंत्रणा कार्यरत असल्याच्या तक्रारी बहुसंख्य उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या. तेव्हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणुकीत व्यस्त असल्याचे सांगितले. मात्र रविवारी उत्पादकांशी चर्चा करायला स्वतः येतो म्हणून त्यांनी दिलासा दिला.

जिल्हाधिकारी रविवारी रावेरला रवाना झाले. त्यांनी उत्पादकांशी चर्चा केली. बऱ्हाणपूर बाजार समितीतील भाव पाडणाऱ्या यंत्रणेविषयी उत्पादकांचा रोष व्यक्त केला. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा उपनिबंधक गौतम बैसाणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आणि जिल्हाधिकारी थेट बन्हाणपूरला रवाना झाले.

त्यांनी बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी सुश्री भव्या मित्तल यांची भेट घेतली. त्यांनी तापीकाठच्या उत्पादकांच्या व्यथा मांडल्या आणि बऱ्हाणपूर बाजार समितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित ठेवावी म्हणून प्रस्ताव . त्यानुसार मित्तल यांनी तातडीने बऱ्हाणपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक प्रतिनिधी बाजार समितीत नियुक्त केला. त्यानुसार मंगळवारी केळीचा लिलाव झाला आणि ९६० रुपयांचे केळी दरात तब्बल ३५० रुपयांची वाढ झाली. मंगळवारी १२९५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले आहेत. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला