⁠ 
रविवार, मे 19, 2024

केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच.. शेतकरी संकटात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२४ । सध्या वाढत्या तापमानामुळे केळी पिकांना मोठा फटका बसत असून यातच भाव घसरत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी केळीला १७०० ते १८०० रुपये बाजारभाव होता. मात्र, तो खाली येत आता श्रीनगर येथे फन्या करून जाणारी किंवा एक्सपोर्ट होणारी केळी १२०० रुपयाला विकली जात असून, सद्यस्थितीत केळीची कटाई ४०० पासून ११०० रुपयापर्यंत होत आहे. भलेही बोर्डावर बाजारभाव जास्त असतील. प्रत्यक्षात क्षेत्रावर केळीची कटाई कमी भावात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात काही बाजार समित्यांनी या विषयावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा केली आहे.

गेल्या पंधरवाड्यात थोडी फार मागणी असल्यामुळे शेतातील केळी बाहेर निघत होती. त्यातही उन्हाळा कडक झाल्याने काही मजूर घराबाहेर पडत नसल्याने बागेमधून केळी काढणे व्यापाऱ्यांनाही अवघड झाले आहे. शिवाय बाजारात चिकू, आंबे, सफरचंद, असे अनेक फळे आल्याने केळीची मागणी आहे तेवढीच आहे. मागणीत वाढ होत नसल्याने व्यापारीही पाहिजे तेवढाच माल खरेदी करीत आहेत.

सद्यस्थितीला मजूर न मिळाल्याने किंवा उन्हाचा तडाखा वाढल्याने वेळेवर न निघालेली केळी गोल झाली किंवा बागखाली करण्याच्या दृष्टीने केळी निघत असल्याने भावाची घसरण ४०० च्या जवळपास पोहोचली आहे. बऱ्याच भागात क्वालिटीचा किंवा एक्सपोर्ट होणारा माल असला, तरी त्यासाठी घड वाहून नेणारे, फण्या करणारी आणि बॉक्समध्ये पॅकिंग करणारे, अशा भरपूर मजुरांची गरज भासत असल्याने तेवढे मजूर बऱ्याच भागात उपलब्ध होत नाहीत, अशी स्थिती आहे.

सावदा, रावेर, चोपडामधून बरेच मजूर येतात. मात्र, ते शिरपूर शिंदखेड्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याने केळीची कटाई वेळेवर होत नसल्याचेही दिसून आले आहे. एकंदरित पाहता भरघोस उत्पन्न देणारे पीक अशी केळीची ओळख होत असतानाच केळीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात खोडा टाकणारे अनेक कारणे सध्या पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे केळीची घसरण आजही थांबलेली नाही. याचा फटका केळी उत्पादकांना बसू लागला आहे.