जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२५ । जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निष्पाप २६ लोक मारले गेले. ज्यामध्ये अधिकतर लोक हे पर्यटक होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पाहायला मिळत असून यातच केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहे. केंद्र सरकारनं भारतातून पाकिस्तानला जाणारं नदीचं पाणी रोखलं असून परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना स्वगृही जाण्याचे आदेश दिले आहेत. काही पाकिस्तानी नागरिक जळगावमध्येही आढळले आहेत.

जळगावात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांची पोलीस प्रशासनाने पडताळणी केली आहे. यामध्ये सार्क व्हिजा घेऊन पाकिस्तानातून जळगावमध्ये कोणीही आले नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. तर टुरिस्ट व्हिजा घेऊन जळगावमध्ये पाकिस्तानातून आलेल्या व्यक्तींची संख्या ही ३२७ एवढी आहे. त्यातील १२ व्यक्तींनी मुदत वाढीसाठी अर्ज केला आहे.
पाकिस्तानातून जळगावात आलेल्या व्यक्ती संदर्भात शासन पातळीवरून जे आदेश येतील. त्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते म्हणाले, ‘जळगावमध्ये टुरिस्ट व्हिसावर आलेले नागरिक आहेत. आपल्यावर सार्क व्हिसावरील कोणी नाही. टुरिस्ट व्हिसावरील लोकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. काहींनी टुरिस्ट व्हिसाच्या मुदत वाढीसाठी अर्ज केला आहे. सरकारकडून जे निर्देश येतील, त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
‘टुरिस्ट व्हिसा असणारे एकूण ३२७ लोक आहेत. मुदत वाढीसाठी अर्ज करणारे १२ लोक आहेत. आम्हाला अद्याप कारवाईबाबत कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत. सरकारकडून वेगळ्या काही सूचना मिळाल्यास आम्ही त्यानुसार कारवाई करू, असे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितले.