जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२५ । एप्रिल महिनाअखेर जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कहर जाणवत उष्णतेच्या लाटेत जळगावकर होरपळून निघत आहे. काल मंगळवारी जळगावचे कमाल तापमान 43.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून त्यापार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जळगाव जिल्ह्यात उन्हाच्या झळा सुरु झाल्या होत्या. तर एप्रिल महिनाअखेर जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कहर जाणवत आहे. मागच्या काही दिवसापासून तापमान ४३ अंशापेक्षा जास्त आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे. दुपारनंतर भाजून काढणारे ऊन पडत आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत गरम उष्णता जाणवत आहे. यामुळे जळगावकर उष्णतेमुळे हैराण झाला आहे.
दरम्यान उष्णतेपासून जळगावकरांना दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत नाही. आजपासून आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३० एप्रिल आणि १ मे साठी हवामान खात्यानं जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला असून रुग्णांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलेले आहे.