जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कारवाई न करता तो सोडून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी ३० हजार रुपये स्वीकारताना महसूल विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली.

ममुराबादचे तलाठी सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४) आणि म्हसावदचे मंडळ अधिकारी अभिजित नामदेव येवले (वय ३९) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. . या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून ४ फेब्रुवारी रोजी ममुराबादचे तलाठी सदानंद मुंडे यांनी त्यांचा वाळूचा डंपर पकडला होता. मात्र, मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी फोनवरून सांगितल्यामुळे तो डंपर सोडून देण्यात आला होता. ही कारवाई टाळल्याच्या बदल्यात या दोघांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात ११ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली.

यानंतर एसीबीने सापळा रचून तलाठी सदानंद मुंडे याला जळगावात ३० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






